‘इंद्रायणीचा पूर’- ‘किस्से’ या मराठी पुस्तकातील एक किस्सा
कथा: अविनाश देशपांडे, शब्दांकन : अंजली शेगुणशी
(वडिलांनी सांगितलेल्या बालपणीच्या कथा)
डोणजे,
हे माझं जन्मगाव. तिथे मी, माझी आई, वडील, दोन थोरल्या बहिणी, तीन थोरले भाऊ आणि आजी
एकत्र राहायचो. मी पाच एक वर्षाचा असताना आम्ही आळंदीला स्थलांतर केलं.
हा
किस्सा आहे बाळचा! माझा सर्वर थोरला भाऊ. बाळ पुण्यात, अनंतराव देशपांडे म्हणजे माझ्या
वडिलांच्या मावसभावाकडे रहात होता. अनंतराव बऱ्यापैकी सधन होते, त्यांना दोन मुलं होती,
मोठा मुलगा वकील होता आणि मुलीचं लग्न झालं होतं. या काकांनी हायस्कूलसाठी बाळला, आग्रहाने
स्वतःकडे ठेऊन घेतलं होतं. लहानपणापासून पुण्यात एकटं राहिल्यामुळे बाळ खूपच धीट आणि
स्वतंत्र मनोवृत्तीचा झाला होता. पुण्यात राहून तो सायकल चालवणे, पोहणे, या सारख्या
गोष्टींमध्ये अगदी तरबेज झाला होता.
शाळेच्या
दर सुट्टीत तो आळंदीला यायचा. तो त्याच्या ठरावीक, दोन मित्रांबरोबर बाहेर फिरायला
जायचा. माझ्या आठवणीत त्यातला एक होता आळंदीच्या मेयरचा मुलगा केशव, आणि दुसरा शरद
गुंगुर्डे. मी कायम त्यांच्याबरोबर बाहेर जाण्यासाठी बाळच्या मागे लागायचो. कधीतरी
तो मला बरोबर न्यायला तयार व्हायचा, तेव्हा मी अगदी खूष व्हायचो.
तो
मी सोडून, इतर कुणालाही बरोबर नेत नसे. “सुरेश आला, तर तो आईला चुगल्या करतो,” असं
म्हणून तो सुरेशला नेहमी टाळायचा. मोहन स्वतःहूनच बरोबर यायला विचारायचा नाही, मग राहिलो
कोण? मी!
“माझ्याबरोबर
यायचं असेल, तर खूप चालावं लागेल. नंतर कटकट करायची नाही, सांगितलेलं ऐकायचं, मधे बोलायचं
नाही, प्रश्न विचारायचे नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी काहीही सांगायचं नाही!”
बाळच्या या सगळ्या अटी मान्य करणारा आणि त्याच्या अगोचर साहसांमध्ये सहभागी होणारा,
मी एकटाच होतो.
मी
आणि सुरेश सामान्यतः सगळी मुलं करतात, त्या सर्व खोड्या, उद्योग आणि टवाळ्या करायचो;
पण बाळबरोबर केलेली प्रत्येक गोष्ट मला खूप थरारक आणि रोमांचकारी वाटायची. माझा आत्मविश्वास
बळकट करण्यामागे बाळचा खूप मोठा सहभाग होता. त्यातला हा एक रोमहर्षक किस्सा!
त्या
वेळी मॅट्रीकची परीक्षा झाल्यावर बाळ, सुट्टीसाठी म्हणून आळंदीला आला होता. मी तेंव्हा
सात-आठ वर्षांचा असेन. दिवस पावसाळ्याचे होते आणि आळंदीत पावसानं आठ दहा दिवस जोर धरला
होता. इंद्रायणीला पूर आला होता आणि तिचं पात्र दुथडी भरून वहात होतं. एका दुपारी पाऊस
थोडा थांबला, तेव्हा बाळ हळूच जवळ आला आणि म्हणाला, “चल अविन येणार का?”
मला
अगदी भरून आलं. अर्थातच कुठे? काय? असा प्रश्न विचारायच्या भानगडीत मी पडलो नाही आणि
मान डोलावली. मग आम्ही दोघं हळूच घराबाहेर पडलो.
“बाळ,
फार लांब जाऊ नकोस. पावसाचा काही भरवसा नाही,” असं आई ओरडली; पण त्याच्या नेहमीच्या
थाटात, काहीही न बोलता त्यानं मला हातानं खुणावलं आणि आम्ही चुपचाप पोबारा केला. लगबगीनं
चालत आम्ही इंद्रायणीच्या काठापाशी पोहोचलो.
उन्हाळ्यात
स्वच्छ आणि सुंदर दिसणारी ही नदी, मला तिच्या या रौद्र रूपात अगदीच भीषण वाटली. तिचं
वेगानं वाहणारं ते गढूळ पाणी, बरोबर जे दिसेल
ते मोठ्या आवेशानं ओढून नेत होतं.
मग
थोड्या वेळात त्याचे दोन मित्र आले. केशव बाळला म्हणाला, “बाळ, आज आपण पुरात पोहायचं.
पुरात पोहायची मजाच वेगळी.”
बाळने
वळून माझ्याकडे पाहिलं, तेवढ्यात त्याचा दुसरा मित्र बोलला, “अरे, तू काळजी करू नकोस.
मी पाहिलं आहे तुला पोहताना. तू फक्त आमच्या मागे रहा. नदीचे भोवरे टाळले, की झालं,
अगदी सोप्पं असतं बघ.”
बाळ
विचारात पडला, “मी खूप चांगला पोहतो तसा; पण मी कधी पुरात नाही रे पोहलो. झेपलं बिपलं
नाही, तर फुकट जीव जायचा,” असं तो म्हणाला.
“पण
मला तर पोहताच येत नाही,” मी चाचरत मधेच बोललो आणि ते सगळे मला हसले.
“येड्या,
तुला कोण नेतंय पुरात? तू फक्त आमचे कपडे सांभाळ,” बाळ म्हणाला.
मग
त्यांनी नदीची पाहणी केली आणि शेवटी त्यांचा बेत पक्का झाला. सगळ्यांनी त्यांचे कपडे
काढून माझ्याकडे सोपवले.
“कपडे
घेऊन घाटावरून आमच्या मागे पळत, पळत यायचं कळलं?” केशव बोलला आणि मी गोंधळून त्याच्याकडे
पाहतच राहिलो.
“हे
बघ, आम्ही खालच्या बाजूला पोहत जाणार आणि स्मशानाच्या आधी, जो घाट आहे, तिथे आम्ही
बाहेर पडणार कारण नदीला खूप ओढ आहे, त्यामुळे पोहत पोहत परत वरच्या बाजूला येणं जमणार
नाही, समजलं?” दुसरा मित्र बोलला.
मग
त्यांनी अजून थोडी चर्चा केली आणि एक जागा निश्चित करून पुराच्या पाण्यात उड्या मारल्या.
मी त्यांचे कपडे घेऊन, नदीच्या काठाने वेगात चालू लागलो; पण नदीला अशी काही ओढ होती
की, काही क्षणातच, ते वेगाने पुढे गेले. आता मी हातात कपडे घेऊन, त्या तिघांबरोबर नदीच्या
काठाने जोरात धावू लागलो. नदीचा जोर भलताच होता आणि हळूहळू त्यांची तीन डोकी, छोटी
छोटी दिसायला लागली.
मला
एवढंच समजलं की, मला अजून वेगात धावायला हवं आणि मग मी जिवाच्या आकांतानी पळायला लागलो.
माझा घसा, त्या ढगाळ आणि दमट हवेतपण, अगदी कोरडा पडला होता. मग थोड्या वेळानी ते स्मशानाच्या
कमानीजवळ पोहोचले. केशव अगदी शिताफीनं पाण्यातून बाहेर पडल्याचं मी दुरून पाहिलं.
“इथेच
बाहेर या. पुढे भोवरा आहे,” असं तो ओरडला.
पण
त्याची सूचना मिळायच्या आत, बाळ पुढे गेला आणि भोवऱ्यात अडकला. माझ्या छातीत धस्स झालं.
त्याचा दुसरा मित्र, त्याच्या मागे पोहत गेला; पण पाण्याचा जोर भलताच होता आणि त्याला
काही बाळला पकडता आलं नाही. भल्या प्रयत्नांनी हातपाय मारीत थोडा पुढे तो भोवऱ्याच्या
बाहेर पडला.
या
सगळ्या प्रकरणात, बहुदा तेपण भांबावून गेले असावेत. ते दोघे हताशपणे एकमेकांकडे बघतच
राहिले. बाळ भोवऱ्यात खाली ओढला गेला आणि माझ्या पायातला जीवच गेला.
“अरे
त्यानं भोवरा तोडला, तो पुढं गेला.” मी कोणाचा तरी आवाज ऐकला.
दूरवर
मला, एक हात आणि डोकं दिसलं. हातातले कपडे फेकून मी बाळच्या दिशेनी धावायला लागलो;
अगदी स्मशानापर्यंत येऊन पोहोचलो. तसा काही मी फार भित्रा नव्हतो; पण या पूर्वी स्मशानात
जाण्याचा प्रसंग, माझ्यावर कधीच आला नव्हता. त्यामुळेच स्मशानाच्या कमानीजवळ जाऊन,
मी क्षणभर थबकलो; पण मग मनाचा हिय्या करून आत गेलो.
आत
गेल्यावर, एका बाजूला मला भल्या मोठ्या गाळात अडकलेला, बाळ दिसला. मी वेगाने त्याच्या
दिशेने पुढे सरकलो, तेवढ्यात तो उभा राहिला आणि ओरडला, “थांब! येऊ नकोस, तू लहान आहेस,
गाळात रुतलास, तर मरशील.”
त्याचे
शब्द ऐकून मी तिथेच थांबलो; पण पुढचं दृश्य पाहून मी अक्षरशः थिजलो. भीती आणि किळस
ह्याचं एवढं परिपूर्ण मिश्रण, मी या पूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं. त्या गाळात बरेच छोटे
मोठे प्राणी अडकून किंवा मरून पडले होते. अनेक उंदीर, काही घुशी, कुत्री, झाडं आणि
शेकडो साप. अगदी गांडूळासारखे. अनेक रंगांचे, आकाराचे, एवढे साप आणि नाग एकत्र मी कधीच
पाहिले नव्हते.
“बाळ,
साप!” मी एवढंच ओरडलो; पण बाळ मात्र निवांत होता. त्याच्या चेहऱ्यावरची रेषपण हलली
नव्हती. तो इकडेतिकडे काही तरी शोधात होता. मग मोठ्या प्रयत्नांनी त्यांनं चिखलात रुतलेली
बाभळीची एक मोठी फांदी ओढली. त्यावर साप उचलून, तो दूर फेकायला लागला. मग तीच काठी
मोडून त्याच्या आधारानी, तो हळूहळू गाळातून पुढे सरकू लागला. त्या सापांच्या खचातून
तो अगदी बिनधोकपणे पुढे पुढे सरकत होता.
“बाळ
साप!” मी परत एकदा ओरडलो.
ते
साप त्याला चावणार, असं वाटून मी डोळे घट्ट मिटून घेतले. तेवढ्यात माझ्या मागून त्याचे
मित्रपण पळत आले. मग सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नांनी, तो अखेर त्या गाळातून बाहेर पडला.
“च्यायला,
आम्हांला वाटलं, तू मेला.” केशव बोलला आणि सगळे खदाखदा हसायला लागले.
आता
ह्यात विनोद काय होता, हे मला तेव्हा उमगलंच नाही. मग बाळने शांतपणे सगळा चिखल साफ
केला आणि नदीवर अंघोळ करून परत कपडे चढवले.
“तू
सापांना घाबारला कसा नाहीस बाळ?” मी विचारलं.
“त्यात
काय घाबरायचंय? ते साप स्वतःचा जीव वाचवणार की, मला चावणार?”
विचार
केल्यावर मलाही त्याचं म्हणणं पटलं आणि मी मान डोलावली.
मग
काहीच घडलं नाही अशा थाटात आम्ही घरी परतलो.
शांत
डोक्यानी विचार केला, तर आपण मोठ्यात मोठ्या संकटातूनसुद्धा सहज बाहेर पडू शकतो. किंबहुना
बरेचदा, नीट विचार केला, तर वरकरणी भीषण वाटणारी संकटं, सत्यात तेवढी भीषण नसतात हा
धडा मला त्या दिवशी नकळतच मिळाला.
- अंजली शेगुणशी