Saturday, 24 January 2026

२.३ शिशिरातूनी उगवेन मी (अदिती हिरणवार)

शिशिरातूनी उगवेन मी 

- अदिती हिरणवार



सध्याचा इंग्लंडमधला ऋतू म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ते केलेली रंगांची उधळण. लाल, पिवळ्या, तपकिरी, शेंदरी रंगांच्या असंख्य छटा लेऊन मोठमोठ्या झाडांवर पानं सळसळताहेत. सप्टेंबर महिन्यात शेवटी शेवटी हवामान थंडावू लागतं. सूर्यप्रकाश असण्याचा दिवसाचा काळ कमी होतो , परिणामतः झाडांची अन्न बनवण्याची प्रक्रिया मंदावते,  "Fall" च्या ऋतूत ही पानं हळूहळू आपला हिरवा रंग सोडून या वेगळ्या वेगळ्या छटा परिधान करतात.  थंडी असूनही मुद्दाम पाहायला बाहेर पडावं इतकं विलक्षण दृश्य असतं ते. 
ही रंग बदललेली पानं फार काळ टिकत नाहीत झाडावर. Fall संपून जेव्हा Autumn चालू होतो तेव्हा वाऱ्याचा वेग वाढलेला जाणवतो.  झाडं सुसाट सुटलेल्या वाऱ्या सोबत हेलकावे घेत असतात, त्या वाऱ्याच्या झोताने पिकली पानं मात्र अलगद फांदीवरून निसटून खाली पडतात. ही पडलेली पानं वाऱ्याच्या भोवऱ्यात सापडून कुठे कुठे भरकटत फिरत असतात.  झाडं निष्पर्ण होऊन भकास बोडकी दिसू लागतात. आजूबाजूची बरीचशी झाडं भकास झाली, काही अजुन विविध छटा दाखवताहेत तर काही वाट्टेल ते झालं तरी ना आम्ही पानं पिकू देणार ना ही ती गळू देणार अशा तोऱ्यात दिमाखात हिरवी पाने लेवून उभी आहेत.
चालायला गेलं एकटंच की या निसर्गाच्या ऋतुचक्राचा आणि आपल्या मानवी जीवनातील अवस्थांचा एकत्र विचार मनात येतोच. झाडं एका वर्षात ऋतूनुसार विविध रूपं धारण करतात. शिशिरात बोडकी झालेली , थंडीचा बोचरा तडाखा सहन करून वसंताच्या आगमनाने कोवळी पालवी ल्यालेली,जसजसा दिवस आपले हात पाय पसरू लागतो, तसतशी गडद लोभस हिरवा रंग मिरवणारी, दिवसातील सूर्यप्रकाश कमी होऊ लागला की अनुभवाने पिकली तरी सौदर्याने नटलेली आणि पुन्हा ते सौंदर्य विरलं तरी हेही दिवस संपतील म्हणत उद्याच्या आशेवर भक्कम उभी ठाकलेली...
आपण माणसंही वयानुसार अशी सर्व स्थित्यंतर अनुभवतो. 
अल्लड बालक, सळसळते तरुणपण, चाळिशी, पन्नाशीत होणारे शारीरिक बदल gracefully हाताळत, साठी सत्तरी पार करून हळूहळू वृद्धावस्थेत पोचतो. माणसाच्या पूर्ण  आयुष्यात  वयानुसार होणारी ही स्थित्यंतरे एकदाच होतात, त्याला ना काही पर्याय असतो आणि कितीही लांबवायची म्हणाली तरी फार काही उपाय नसतो. प्रत्येक स्थित्यंतर स्वीकारत गेलं की बहुदा त्याचा फार त्रास होत नसावा.
वयाने एकदाच होत असली तरी मनाने मात्र ही स्थित्यंतरे आपण बरेचदा करतो. कधी तरल वाटतं तर कधी जोषपूर्ण. एखादं आलेलं आव्हान , त्याच्याशी दोन हात करून झाल्यावर जाणवतं की मन शिणलंय... त्याला निवांत पणाची गरज आहे. स्वतः कडे डोळसपणे बघून स्वतःचेच बरेचसे रंग अनुभवायची गरज आहे. त्यात नको असणारे जीर्ण झालेले, कुचकामी झालेले विचार आतून आलेल्या एखाद्या वावटळीत स्वाहा करायची गरज आहे. काही दिवस रिक्तपणा अनुभवत,आतून अलगद फुटणारे सर्जनशीलतेचे धुमारे शिलकावयाचे. पुन्हा तरल, सळसळणारी ऊर्जा घेऊन तरुण होतं मन.  
शरीराला जरी शिशिरातून उगवयाची मुभा नसली तरी मनाला नक्कीच आहे हो ना?
‘लहरेन मी, बहरेन मी
शिशिरातुनी उगवेन मी’*

अदिती हिरणवार, रेडिंग, यु. के. 
[सुधीर मोघे यांच्या ‘एकाच या जन्मी जणू’ या कवितेतील ओळींप्रमाणे]


No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर