Saturday, 24 January 2026

२.१ प्रेमाची उत्क्रांती (आनंद शिंत्रे)

प्रेमाची उत्क्रांती

– आनंद शिंत्रे

प्रेम म्हटले की मराठीतल्या अनेक प्रसिद्ध कवींच्या मनाला भिडणाऱ्या कविता आठवतात. मंगेश पाडगावकरांची कविता सांगते:

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!

प्रेम या दोन अक्षरी शब्दाचा अर्थ किंवा सोपी व्याख्या करायला कदाचित शेकडो शब्द लागतील आणि तरीही पूर्णता येईल अशी खात्री नाही. खाण्याची/संगीताची/प्रवासाची आवड, संपत्तीचा मोह, सौंदर्याचे/प्रसिद्धीचे  आकर्षण असते. आवड, आकर्षण, मोह हे प्रेमाहून वेगळे असल्याचे लक्षात न आल्याने बरेच लोक त्यांचे वर्णन करताना प्रेम शब्द वापरतात! प्रेमामध्ये दुसऱ्यांच्या सुखाची कामना करणे, त्यांच्या गरजांबद्दल संवेदनशील असणे आणि त्यांच्यासोबत भावनिक संबंध जोडणे अपेक्षित असते. ते केवळ रोमँटिक आकर्षण नसून त्याला मैत्री, कौटुंबिक स्नेह आणि परस्परांची काळजी असे अनेक स्तर असतात. लहानपण, किशोरवय, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था यामधील प्रेम वेग-वेगळ्या प्रकारे प्रकट होते. त्याचप्रमाणे, विविध नातेसंबंधांमधील प्रेमाचे स्वरूप —विशेषत: पालक-पाल्यांमधील प्रेम, पती-पत्नीचे प्रेम आणि मुलांचे त्यांच्या पालकांवरील प्रेम यांचे रंग-रूप वेगळे असते.

आईचे बाळाबद्दल प्रेम, लहान मुलांचे पालकांवरील प्रेम, प्रियकर किंवा जोडीदाराचे प्रेम,तरुण मुलांचे वृद्ध आईवडिलांचे प्रेम , आपल्या पाळीव प्राण्याबद्दल प्रेम अशा एक ना अनेक प्रेमाचे रंग आणि छटा आहेत. प्रेम ही दोन सजीवांमधील अशी भावना आहे, जी वय आणि नातेसंबंधांच्या बदलत्या परिस्थितीनुसार विकसित होते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या भावनेची तीव्रता, रूप आणि अपेक्षां यात फरक होत जातो हे आपण सर्वांनी अनुभवले आहे.

बाळपणी प्रेमाची भावना ही त्यांना आईपासून मिळणाऱ्या अनुभवांवर अवलंबून असते. लहान मुलांचे प्रेम निराकार असते, कारण त्यांना त्यांची काळजी घेणाऱ्यापासून अधिक काही अपेक्षित नसते. पालकांनी दिलेल्या भावनिक आणि शारीरिक संरक्षणाच्या आधारावर मुलांचा झपाट्याने विकास होतो. लहान मुलांच्या प्रेमाचे स्वरूप पालकाशी असणारी जवळीक, आणि भावनिक बंध यामार्गे निरागसतेने व्यक्त होते. पालकांचे प्रेम हा बाळाच्या वाढीसाठी महत्वाचा खुराक आहे, ज्यामध्ये मुलांना धोक्यातून वाचवण्याची, त्यांचा चांगला विकास होण्याची आणि त्यांच्या भविष्यासाठी आदर्श निर्मितीची क्षमता आहे. त्या आईच्या प्रेमाचे वर्णन कवि यशवंत ‘आई म्हणोनी कोणी’ या कवितेत करताना ‘स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी । असे लिहून जातात.

मुले(/मुली) पौगंडावस्थेत (adolescence) प्रवेश करतात, तसे त्यांची प्रेमाची समज अधिक गुंता-गुंतीची होते. हे प्रेम हे रोमँटिक प्रेम आणि आपल्या कुटुंबाच्या बाहेर इतर नातेसंबंधांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत असते. ही वयात येणारी मुलं प्रेमाची भावना इन्फॅच्युएशन किंवा आकर्षण म्हणून अनुभवतात, जे त्यांच्या सहवासाच्या आणि साथीदाराच्या शोधाशी संबंधित असते. हे प्रेम, मुख्यतः, स्व-ओळखीचा, नवीन भावना अनुभवण्याचा आणि रोमँटिक नातेसंबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो. पाडगावकर पुढे लिहितात:

दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं…’

पालक आणि या वयातील मुलांमधील प्रेमाचा संबंध मात्र आता बदलू लागतो. पौगंडावस्थेतील मुलं स्वायत्ततेच्या शोधात असतात आणि पालकांपासून काही प्रमाणात दूर जातात. यामुळे कधीकधी ताण निर्माण होऊ शकतो. तरीही, पालकांचे प्रेम नेहमीच टिकून राहते. पालक आता अधिक मार्गदर्शन आणि आधार या स्वरूपात ते व्यक्त करतात. काही पालकांना मात्र हा बदल किंवा मुलांचे वाढते स्वातंत्र्य स्वीकारायला अवघड जाते.

प्रौढावस्थेत प्रेम एक अधिक प्रगल्भ आणि वचनबद्ध रूप धारण करते. सुधीर मोघे लिहितात

दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं
 तसंच काहीसं पाऊल न वाजवता... आपल्या आयुष्यात प्रेम येतं

विशेषतः, पती-पत्नींचे प्रेम हे एक गडद, विश्वासावर आधारित आणि एकत्रित ध्येयांवर आधारित असते. किशोरवयातील उत्कटतेच्या तुलनेत, प्रौढावस्थेतील प्रेम सहवास, सामायिक अनुभव आणि दैनंदिन जीवनाच्या जबाबदाऱ्या यावर आधारित असते. रोमँटिक आकर्षण अद्याप अस्तित्वात असले तरी ते अर्थाजन, मुलांचे पालन-पोषण, आणि घराच्या जबाबदाऱ्या इत्यादी व्यावहारिक गोष्टींबरोबर संतुलित करावे लागते. सफल लग्नांमध्ये, प्रेम ही एक सुख-दुख्खाची भागीदारी असते. हे प्रेम वेळोवेळी बदलू शकते, परंतु त्याचा पाया असलेली विश्वास, आधार आणि सहवासाची भावना तीव्र असते. विशेषत: मुलांची काळजी, आर्थिक आणि इतर जबाबदाऱ्यांच्या दबावातही एकमेकांच्या प्रेमाची जपलेली स्थिरता आणि आधार या नात्याचे खास वैशिष्ट्य असते. 

या काळातच पालकांच्या मुलांबद्दलच्या प्रेमातही बदल होऊ लागतो, मुलं प्रौढ होऊन स्वतंत्र जीवन जगायला लागतात, त्यामुळे पालकांचे प्रेम आता देखरेख करण्यापेक्षा सल्ला देण्याच्या आणि भावनिक आधाराचे  बनते. पालकांचे प्रेम कायम असतेच आणि ते मुलांच्या यशामुळे वाढत जाते.

वृद्ध वयातील पती-पत्नींचे प्रेम एकदम शांत, सहनशील आणि आठवणीने भरलेले असते. अनेक वर्षांच्या सहवासामुळे, प्रेम एकाच पातळीवर आणि त्यांच्या सहवासाच्या आणि आठवणींच्या आधारावर ठरते. खरे प्रेम कायम रहाते. उडते ती वासना. शारीरिक शक्ती कमी झाल्यामुळे, भावनिक जवळीक आणि सहवासाच्या गरजा वाढतात.

वयस्कर पालकांचे प्रेम त्यांच्या मुलांच्या कर्तृत्वाचा अभिमान आणि आनंदाच्या रूपात व्यक्त होते आणि त्याचवेळी मुलांचे पालकांवरील प्रेम आता त्यांची काळजी वाहण्याच्या आणि कृतज्ञतेच्या रूपात बदलते. मुले  त्यांच्या वयस्कर पालकांच्या शारीरिक कमजोरीचे आणि मुलांसाठी घेतलेल्या कष्टाचे /त्यागाचे मूल्य ओळखू लागतात, ज्यामुळे प्रेमाचा रंग अधिक गहिरा आणि सन्माननीय रूप धारण करतो ! यामुळे हेही सिद्ध होते की प्रेम ही एक शाश्वत पण उत्क्रांत होणारी भावना आहे. ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ लिहिताना कुसुमाग्रज म्हटतात:

‘युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी,कितीदा करु प्रीतीची याचना’

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रेम मिळण्याचे फायदे होतात तितकेच प्रेमाच्या कमतरतेमुळे होणारे गुंतागुंतीचे परिणामही होतात. प्रेमाची कमतरता अनुभवलेल्या मुलांना समस्या सोडवण्यात, भावनिक नियमन आणि सामाजिक संवाद करण्यामध्ये अडचणी येतात. अशी मुले स्वतःवर आणि इतरांवर देखील विश्वास ठेऊ शकत नाहीत. किशोरवयातील आत्मसन्मानाचा अभाव, एकटेपण आणि आपली ओळख काय आहे याबद्दल गोंधळ यांचे व्यक्तिमत्वावर कायमचे व्रण रहातात. अनेकदा तरुणवयातील व्यक्ती असे भावनिक रिकामपण  भरून काढण्यासाठी दारु पिणे, नशाखोरी, बंडखोरी किंवा आत्मविनाशक वर्तन करू लागतात. यामुळे त्यांचे पालकांशी किंवा पालकांचे आपसातील प्रेमाचे नातेही बिघडते. जेव्हा प्रौढ जोडप्यातील एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराकडून भावनिक दुर्लक्ष किंवा कमी लेखला जाण्याचा अनुभव घेतो तेव्हा संवाद तुटतो आणि शेवटी नात्याचे विघटन होऊ लागते. प्रेमाची कमतरता हे पुढे अनारोग्याचेही कारण बनते.

अनेक प्राणी त्यांच्या देखरेख करणाऱ्यांशी, इतर प्राण्यांशी किंवा माणसांशी घट्ट स्नेह-बंध तयार करतात. हे बंध मानवी प्रेमासारखे मजबूत असतात.अनेक प्राण्यांमध्ये आनंद, भय, प्रेम, आणि शोक यांसारख्या भावना असू शकतात आणि त्या भावना मूकपणे वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करतात. असे प्रेम कळण्यासाठी संवेदनशील मानवी मन मात्र हवे ! माकडे, हत्तींसारखे कळपात राहाणारे प्राणी ज्या प्रकारे कळपातील इतर सभासदानाही  निस्वार्थीपणे मदत करतात तो त्या प्राणिमात्रातील प्रेमाचा दाखलाच आहे.  

आपल्या अनेक संतांनी परमेश्वराला आई किंवा माऊली असे संबोधून त्या प्रेमाचा दाखला दिला आहे.या प्रेमात भक्त ईश्वरासारख्या संकल्पनेशी भावनिक ऐक्य साधतो. हे ईश्वर प्रेम जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळवून देते, जसे संत तुकाराम म्हणतात, वेधले वो येणे श्रीरंगे, मी माझी अंगे हारपली’ आणि ‘परते चि ना दृष्टी बैसली ते ठायी, विसावोनि पायी ठेले मन’... ईश्वर-प्रेम अनुपम आहे, त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. सर्वभावपूर्णतेने ईश्वराशी एकरूप होण्याचा दाखला देताना ज्ञानेश्वर सांगतात: (जशी) पावसाच्या धारेला पृथ्वीवर येण्याशिवाय दुसरी गती नाही.

‘परि तेचि भक्ति ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी,धरावांचूनि अनारिसी, गतीचि नेणें ॥ ६८६ ॥’

‘तैसें सर्वभावसंभारें, न धरत प्रेम एकसरें, मजमाजीं संचरे, मीचि होऊनि ॥ ६८८ ॥’

भगवंताविषयी प्रीती, लडिवाळपणा आणि त्याच्यातून फुललेला भक्तिरंग हा मानवी प्रेमाच्या उत्क्रांतीतील सर्वोच्च स्तर नाही का?  

- आनंद शिंत्रे. रेडिंग, यु. के. 

1 comment:

  1. धाई अक्षर प्रेम के पाढे सो पंडित होय…….: तुलसीदास. छान लेख आहे आनंद जी. बृहद अभ्यंकर

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर