‘भुताचं भुयार’- ‘किस्से’ या
मराठी पुस्तकातील एक किस्सा
कथा: अविनाश
देशपांडे, शब्दांकन : अंजली
शेगुणशी (वडिलांनी सांगितलेल्या बालपणीच्या कथा)
‘भुताचं भुयार’- ‘किस्से’ या मराठी पुस्तकातील एक किस्सा
कथा: अविनाश
देशपांडे, शब्दांकन: अंजली शेगुणशी (वडिलांनी सांगितलेल्या बालपणीच्या कथा)
ही गोष्ट आहे माझ्या लहानपणाची! १९५२ ते १९५३ च्या सुमाराची.
आळंदीला माझ्या पक्का लक्षात राहिलेला हा अजून एक किस्सा.
तेव्हा मी तिसरीत म्हणजे आठ-नऊ वर्षांचा असेन. मी आणि माझे मित्र नेहमी आमच्या
गल्लीत चोर-शिपाई खेळायचो. याच गल्लीत एक जुना पडका वाडा होता. तिथे दोनच खोल्या ठीकठाक
होत्या आणि बाकी सर्व खोल्यांची पडझड झाली होती. या आख्ख्या वाड्यात, एकच म्हातारी
राहायची, ती वयाने साधारण पंचाहत्तर-ऐंशीच्या दरम्यान असावी. तिचा चेहरा सुरकुतलेला,
अंगकाठी बारीक आणि आवाज किरटा! या पडक्या मोठ्या वाड्यात ती एकटीच
रहायची. या पडक्या वाड्याच्या परसात पेरू, डाळिंब, सीताफळ, पपई, बोरं अशी अनेक फळझाडं
होती आणि ती कायम फळांनी लगडलेली असायची. आता ही म्हातारी कधी ती फळ उतरून पण घ्यायची
नाही आणि कोणी मुलं फळं तोडायला आली तर त्यांना तोडू पण द्यायची नाही. असं का? ते तिचं
तिलाच माहीत; पण त्या वाड्यात जाण्याची किंवा ती फळ तोडायची परवानगी कोणालाच नव्हती.
एक दिवस अचानक ही म्हातारी मेली. मग तिच्या नातेवाईकांची शोधाशोध सुरू झाली.
कोणीतरी पुण्याहून, तिच्या एका लांबच्या नातेवाईकाला पकडून आणलं. मग तिचा अंत्यविधी
पार पडला. अर्थात हा माणूस तिचा खूपच लांबचा नातेवाईक असल्यामुळे, तिला अग्नी देऊन
तो लगेच परत गेला.
मग साधारणतः आठ ते दहा दिवसांनी मी आईला एका बाईशी बोलताना ऐकलं, “बिचारीचा
दहावा बारावा कोण करणार? चांगली होती तशी.”
मग ती बाई म्हणाली, “आता तिच्या आत्म्याला शांती कशी मिळणार? तो गवळी माहीत
आहे का?
काल पहाटेच, तिचं भूत पाहिलं म्हणे त्यांनी वाड्याबाहेर!”
त्यांचं बोलणं ऐकून मी चांगलाच चरकलो. मी त्या दोघींचं बोलणं ऐकतो आहे, असं
लक्षात आल्यावर आईनी मला तिथून हकलवलं.
हळूहळू ही भुताची गोष्ट, अख्ख्या गावात पसरली. खरं खोटं कोणाला माहीत? पण हळूहळू
म्हातारीचं भूत पाहिल्याचे दावे, इतर बऱ्याच जणांनी सुरू केले. लवकरच त्या वाड्याला
भुताटकीचा वाडा म्हणून शिक्कापण मिळाला.
मागच्या परसातली झाडं फळांनी लगडलेली होती; पण आत जायची कोणाची हिम्मत नव्हती.
संध्याकाळ झाली आणि अंधार पडला की, आम्ही मुलं रामरक्षा म्हणत जीव मुठीत धरून त्या
वाड्यासमोरून पळत जायचो.
असाच एका दुपारी मी आणि माझेकाही मित्र त्या वाड्यापुढे उभे होतो.
“ती झाडं बघ कशी फळांनी लगडलेली आहेत. चल जायचं का?” मी विचारलं.
“अरे, पण ती म्हातारी डोक्यावर बसली तर? ती इथे भूत बनून राहते. तुम्हाला मरायचं
असेल, तर तुम्हीच मरा. आम्ही नाही येणार.” काही जण म्हणाले.
मी थोडा नाराज झालो; पण अचानक माझ्या भावड्या नावाच्या एका धटिंगण मित्राचा
हात माझ्या खांद्यावर पडला, “चल, मी येतो तुझ्या बरोबर.” तो म्हणाला. माझा हा मित्र
माझ्यापेक्षा दोन तीन वर्षं मोठ्ठा असावा. तो माझ्यापेक्षा उंच आणि अंगाने पण चांगला
दणकट होता. आता त्याची साथ मिळाल्यावर माझा आत्मविश्वास दुणावला. तशीपण ती वेळ दुपारचीच
होती, त्यामुळे आम्हीपण तसे निवांतच होतो. इतर मुलांकडे दुर्लक्ष करून आम्ही त्या वाड्यात
शिरलो. आत जाईपर्यंत तसा मी निर्धास्त होतो; पण त्या वाड्याचं आतलं पडकं आणि भीषण स्वरूप
पाहून माझा उत्साह जरा कमी झाला.
“तुला काय वाटत अव्या? ह्या वाड्यात खरंच भूत असेल का?” भावड्या हळूच माझ्या
कानात खुसफुसला आणि माझ्या मनात भीतीची एक कळ उठली.
“मला भाऊंनी सांगितलंआहे की, भूत-बीत असलं काही नसतं, आणि जरी भुतं असली, तरी
ती उन्हाला घाबरतात आणि पळून जातात असं माझी आई म्हणाली होती मला एकदा.” मी कसनुसा
मनाचा धीर करून बोललो.
मग दबकत दबकत, त्या पडक्या-झडक्या खोल्या ओलांडून आम्ही परसापर्यंत पोहोचलो.
तिथे फळांनी लगडलेली झाडं पाहून आमची भीती पार पळाली. आम्ही अगदी हावरटासारखे एकमेकांकडे
पाहिलं. बरीच फळं खाली गळून पण पडली होती; पण तरीही आम्ही उगीचंच झाडांवर चढून झाडावरची
फळं तोडली. मस्त हाताला लागेल त्या फळावर आम्ही तुटून पडलो. अर्धा एक तास फळांवर यथेच्छ
ताव मारून झाल्यावर आम्ही इकडे तिकडे बघायला लागलो. मग आमची नजर एका मोठ्ठ्या गाडग्यावर
पडली. त्या गाडग्याच्या बाजूला बऱ्याच विटा रचलेल्या होत्या. हे गाडगं थोडं सरकलेलंहोतंआणि
त्या गाडग्याच्या खाली कसला तरी खड्डा असावा असं वाटलं. आम्ही जवळ जाऊन त्याचं निरीक्षण
केलं. आम्हांला वाटलं की, ते न्हाणी घरातलं पाणी जायचं भोक असावं; पण तेअसं झाकलं का
बरं असावं? असं आमच्या मनात आलं आणि आम्ही ते गाडगं थोडं सरकवलं. पाहतो तर काय त्याच्या
खाली माणूस आत जाऊ शकेल एवढा मोठा खड्डा दिसला. आम्ही आत वाकून बघितलं. आत चक्क भुयार
असावं असं वाटतं होतं. माझ्या मनात या भुयाराचं भयंकर कुतूहल निर्माण झालं.
“कदाचित या भुयारात काही तरी खजिना दडवला असेल कोणी. आत जाऊन बघायचं?” मी विचारलं.
“नको बाबा! फळ खाण्यापर्यंत ठीक आहे; पण असल्या भुयारात वगैरे आपण नाही येणार.”
असं जाहीर करून भावड्या मोकळा झाला.
पण माझं कुतूहल हे माझ्या भीतीपेक्षा अधिक भारी ठरलं. इथे भूत नाही याची मला
खात्री पटली होती. मग मी त्याला म्हणालो, “हे बघ मी जातो आत, नी पाहतो काय आहेते. तू
इथे उभा राहा आणि जर मी खूप वेळ परत नाही आलो, तर आरडाओरडा करून लोकांना बोलव, कोण
न कोण तर मदतीला येईलच.” मी म्हणालो. आता या योजनेला फार काही विरोध करण्याचं कारण
नसल्यामुळे भावड्या तयार झाला.
मग त्यानी मला हाताला धरून त्या भुयारात उतरवलं. तसा हा खड्डा निदान चार ते
पाच फूट खोल असावा, कारण त्याने मला सोडल्यावर मी काही इंचांनी जमिनीवर आपटलो. बाहेर
कडक ऊन असल्यामुळे आत बऱ्याच दूर पर्यंत अंधुकसं दिसत होतं. हे भुयार आतनू अगदी व्यवस्थित
लिंपल्यासारखं दि सत होतं. थोडं पुढे गेल्यावर मला दोन मार्ग दिसले. त्यातल्या एकात
मी घुसलो. हळूहळू पुढे सरकत मी बराच पुढे गेलो. आता अंधार वाढू लागला आणि आत एक प्रकारचा
ओलसर कुबट वास येऊ लागला. पण कदाचित पुढे खजिना असेल, या आशेनी मी पुढे चालत राहिलो.
मातीच्या कोंदट, कुबट वासानी मला घुसमटायला लागलं. आता अंधार इतका वाढला होता की, मला
काहीच दिसेना. अचानक माझा पाय कशाला तरी अडखळला आणि मी खाली पडलो. मी हातानी चाचपलं
आणि हाताला जे लागलं, ते हाड आहे की लाकडाचा ओंडका हे सांगण अवघड होतं; पण तरीही मनाचा
हिय्या करून मी परत उठलो आणि चालायला लागलो.
गंमत अशी, की अंधारात पडल्यामुळे मी नेमक्या कुठल्या दिशेने चालत आलो होतो
ते मला उमगेना. मग मात्र माझी चांगलीच तंतरली आणि आता परत फिरण्याच्या हेतूने, मी एका
दिशेला चालू लागलो. बराच वेळ चालून जेव्हा मला काहीच दिसेना, तेव्हा माझ्या पायातलं
त्राणच गेलं. श्वास घेणं अजून कठीण झालं होतं. मी जिवाच्या करारावर उठलो आणि उलट्या
दिशेनं जोरजोरात धावायला लागलो.
“भावड्या... भावड्या...” असं जिवाच्या आकांतानी ओरडायला लागलो.
काही वेळ पळल्यावर मला थोडा अंधुकसा उजेड दिसू लागला, आणि मला पळायला आणि ओरडायला
थोडा हुरूप आला.
“भावड्या... भावड्या... आहेस का तू?” मी परत ओरडलो.
“मी आहे ... मी आहे!” असा पुसटसा आवाज माझ्या कानी पडला. मी आवाजाच्या दिशेने
धावलो,
आणि शेवटी जिथून मी या भुयारात शिरलो होतो, तिथे परत पोहोचलो.
हा खड्डा तसा उंच असल्यामुळे मला बाहेर पडता येईना. “माझी उंची पुरत नाहीये,
तू ये आत मला बाहेर काढायला.” मी ओरडलो.
भावड्या आत वाकून पाहू लागला. माझं तोंड पाहून त्याला काय वाटलं माहीत नाही;
पण तो आत उतरला आणि मग त्याने मला बाहेर ढकललं आणि मग स्वतः पण वर आला.
सर्वांत पहिल्यांदा मी मोठ्ठे मोठ्ठे खोल श्वास घेतले; पण अजून पण माझ्या हृदयाचे
ठोके मला स्पष्टपणे ऐकू येत होते. पाच एक मिनिटं बसल्यावर मला जरा हुशारी आली.
“तरी मी तुला सांगत होतो, आत नको जाऊस. बरं मेला-बिला नाहीस. चल आता निघूया
इथून आणि या विषयी कोणाला बोलू नकोस, नाहीतर दोघं लाटण्याने मार खाऊ,” भावड्या बोलला.
मला त्याचं म्हणणं पटलं आणि मी मान डोलावली. मग ते गाडगं होतं तसं पुन्हा जागेवर
सरकवून आम्ही त्या वाड्याच्या बाहेर पडलो.
हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही. पुढे मोठा झाल्यावर एकदा मला हा प्रसंग आठवला
आणि मी त्यावर विचार करू लागलो. सहज आईला मी त्या वाड्याविषयी बोललो आणि मग मला असं
समजलं की, त्या बाईचे नवरा, दीर आणि सासरे, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. एकाला
तर शिक्षा पण झाली होती म्हणे.
सर्व बाजूंनी विचार करता मी या अनुमानाला पोहोचलो की, तो नक्की पळवाटीसाठी
बनवलेला भुयारी मार्ग असणार, कारण हे भुयार आतून चक्क सारवल्यासारखंहोतं. शिवाय त्याला
दोन मार्गसुद्धा होते. स्वातंत्र्यपूर्व काळात, हे घर या क्रांतिकारकांचं भेटायचं ठिकाण
असावं. चुकून पोलीस आले, तर लपनू बसायला किंवा पळून जायचा हा मार्ग असावा. म्हणूनच
कदाचित ही म्हातारी कोणाला तिथे येऊ देत नसावी? अर्थात हा माझा तर्क, खरं खोटं कोणाला
माहीत?
पुढे मी सैन्यात भरती झालो तेव्हा मला कायम वाटायचं की
जर मी त्या वेळी थोडा मोठ्ठा असतो आणि माझ्या हातात मशाल असती, तर ते भुयार नक्की कुठे
जातं हे मी नक्की जाणून घेतलं असतं!
- अंजली शेगुणशी.